निसर्ग आपल्याला बरेच काही शिकवत असतो. निसर्ग सानिध्यात बरेच… नव्हे सर्वच जीव आश्रित आहेत. आणि त्या सार्यांनाच त्याची अनुभुती येत असते. निसर्गाच्या समवेत जगण्याची मजा औरच… पण आज माणूस इतका प्रगत झाला कि तो त्या निसर्गाला आव्हान देऊ लागला. काँक्रेटच जग उभं करण्यासाठी अगणित झाडांची कत्तल केली जात आहे. आणि त्याचे परिणामही भोगतो आहे पण सुधारेल तो माणूस कसला…
असो…काही दिवसांपूर्वीच आजोळात काकांच्या घरामागे झाडांच्या साफसुथऱ्या गर्दीत एक शर्थीचे आव्हान पहावयास मिळाले… पपईच्या एका झाडावर दोन गोंडस पक्षी ज्याला आम्ही बुलबुल म्हणतो, रोज येऊन बसत… मागे सतत पाण्याचा निचरा आणि बाकी इतर झाडांची सावली, त्यामुळे तिथे सतत कडकडत्या उन्हातही थंडावा असतो… एकंदरीतच त्यांनी ती जागा हवेशीर आणि माणसाळलेली पाहून आपले घरटे बांधण्याचा निर्णय घेतला.
आता जागा निवडली ती पपईच्या झाडाच्या थेट शेंड्यावर. म्हणजे कुणाचं तिथे चढणं नाही कि पाहणं नाही असं बुलबुलना वाटलं. रोज थोडं थोडं करून तीन दिवसानंतर घरट्याला घरपण आले. सुरेख असे वाऱ्याने पपईबरोबर हरकत करणारे साजेशे घर. त्यांना माहित होतं इथं माणसांपासून आपल्याला काही धोका नाही. दोघंही तिथे नांदू लागले. चौथ्या दिवशी त्या घरट्यात एक अंड्याची भर झाली. चिमुकला जीव आईच्या गर्भातून जगात आईच्या प्रेमाच्या आवरणात बंदीस्त असूनही निर्धास्त त्या गोजिरवाण्या घरात स्तिथ झाला. दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा. असं करता दोघांच्या संसारात आणखीन तीन बुलबुलच्या तारा नवे स्वर छेडण्यासाठी सज्ज झाल्या. त्यांना फक्त मायेच्या उबेची गरज होती.
आणि काळाने घात केला. निसर्गाने आपले हात उंचावले. पपईने आकाशाला भिडण्यासाठी एक पाऊल वर उचलले…राहते घरटे एका कुशीवर वळू लागले…जणू धरीत्रीकडे पाहण्यास ते वळले…नवे स्वर छेडणाऱ्या तारा आपसूकच कंपू लागल्या… तीन तारातील एक तार छेडली गेली… त्या कंपणाने घरट्यातून ती जमिनीकडे आकर्षित झाली…आपल्या मायेची उब सोडून धरीत्रीच्या चरणी ठप…चा स्वर बोलून विस्कळीत पसरली…. पुन्हा कधीच न उमटण्यासाठी…
पण वर बुलबुलच्या अंतरीचे, आईच्या आर्ततेचे स्वर टाहो फोडत होते… विस्कटलेल्या स्वरांना संजीवनी देण्याचा अशक्यप्राय प्रयत्न वारंवार करत होते. त्यातच दुसऱ्या दिवशी दुसरे…पुन्हा तोच आक्रोश…काय गुन्हा…, म्हणून त्या ईश्वराला कोसीत होते…विसरले होते…त्या मोहमायेत दुसऱ्याच्या उरावर आपण बस्तान केले आहे…त्याचाही उर भरून येईल…तो हि जगण्याची धडपड करेल…आणि त्या वेळेस आपण असूनही नसल्यासारखे असू… आयुष्याचा खेळ कधी कलाटणी मारून जाईल सांगता येत नाही.
तात्पर्य :- जगण्याचा अधिकार सार्यांनाच असतो, प्रत्येकाने प्रत्येकाचा मान ठेऊनच जगलं पाहिजे. नकळत झालेल्या कर्माची सुद्धा फळं भोगावीच लागतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपणच ओढवलेली असते. इतरांना दोष देण्यात अर्थ नसतो.
…नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)
