गोंधळ मानव निर्मितीचा

​आज एक लेख वाचनात आला त्या अनुषंगाने ….

या विश्वात माणसाची उत्पत्ती कशी झाली ?

म्हणजेच पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झाले ?

आणि सजीवातील प्रजनन यंत्रणा निसर्गाने कशी निर्माण केली असावी ?

शंकाच आहे ना..!!

        माणूस आज इतका प्रगत झाला तरी याबाबतीत त्याच्या मनात मतभिन्नता आहे. वैज्ञानिक दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्टिने या प्रश्नांची उत्तरे समाधान कारक देण्याचा प्रयत्न केला तरी ती उत्तरे समाधानकारक नाहीत. 
पण अध्यात्माच्या दृष्टीने पृथ्वीवरील सजीवसृष्टी, सर्वव्यापी सर्वशक्तिमान ईश्वराने निर्माण केली. इथे प्रश्न संपतो. आणि विज्ञानाच्या दृष्टीने हि सजीव सृष्टी योग्य परिस्तिथी आणि घटक जुळून आल्यामुळे स्वयंभुरीत्या अस्तित्वात आली. अरे असे कसे घटक जुळून येतील त्याला जुळवणारही असेलच कि…
मुळात या पृथ्वीवर अगणित प्रकारचे जीव आहेत.  थॉमस हेन्री हक्सले यांनी १८६३ साली माकडांच्या काही प्रजातीत उत्क्रांती होऊन मानवाची निर्मिती झाली असे विश्वासपूर्वक जाहीर केले.  पण प्रश्न असा आहे कि या वसुंधरेवर त्या अगणित जीवांपैकी फक्त माकडांचीच उत्क्रांती कशी झाली आणि पूर्णतः का झाली नाही. इतर प्राण्यांमध्ये तसे बदल का नाही झाले. बरं त्यांच्यात झाली तर ती प्रजाती अजून अस्तित्वात कशी !! हि मनात शंका आहे. असो…

        चार्ल्स डार्विन यांनी १८५९ साली ओरिजिन ऑफ स्पेसिज या ग्रंथात पृथ्वीवर आधीच अस्तित्वात असलेल्या प्रजातीत पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी कशी उक्रांती झाली आणि प्रबळ प्रजाती कशा निर्माण झाल्या याचे विवेचन आहे. पण पृथ्वीवर मुळातच सजीव कसे निर्माण झाले याविषयी उल्लेख किव्हा चर्चा नाही.

        १८व्या शतका अखेरीस डार्विनने पृथीवरील उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला पण त्याच्याही आधी हजारो वर्षांपूर्वी भारताच्या ऋषिमुनींनी विष्णूच्या दशवतारात हाच सिद्धांत मांडला आहे. ३.५ अब्ज वर्षांपूर्वी सागरी सजीवांपासून आजच्या मानवापर्यंतची सजीवांची उक्रांतीच सांगितली आहे.

          दुसरी गोष्ट अशी कि सजीवातील प्रजनन यंत्रणा निसर्गाने कशी निर्माण केली असावी ? म्हणजेच नर आणि मादी. प्रजननासाठी लागणारे अनुवंशिक तत्व आणि ते जनक पिढ्यातून अपत्य पिढ्यात संक्रमित होण्यासाठी आज्ञावल्या कश्या निर्माण झाल्या असाव्यात..?
निश्चितच यामागे एक अदृश्य शक्ती आहे. आणि तीच शक्ती हे विश्व चालवते हे नाकारता येणार नाही. या विश्वात अगणित प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच ती अदृश्य शक्ती. म्हणजेच ईश्वर. आज साहित्य क्षेत्रात जगातील सर्वात जुनं आणि प्रथम साहित्य म्हणून वेदांचा नावलौकिक आहे. आणि चारही वेद हरीचे गुणगान गातात ते उगा नाही. पाचवा वेद गणला जाणाऱ्या तुकोबांच्या गाथाही त्या अखिल कोट ब्रह्माण्ड नायक पांडुरंगाचे गुणगान गातात ते उगा नाही.
याही पलीकडे तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच ईश्वराची अनुभूती येईल…

…नितेश पाटील

सिक्कीमच्या वाटा…

​प्रवासाचा तिसरा दिवस रविवार 25 सप्टेंबर. मी जरी तेवढ्यातच घुटमळत असलो तरी गाडीने मात्र मला दीड तास उशिरा का होईना, पश्चिम बंगाल मधील, शिलिगुडी शहरातील न्यू जलपाईगुडी स्टेशनला, सकाळी पाच वाजता पोहचवले. मुसळधार पाऊस स्वागतासाठी सज्ज होता. त्याचे अंग चोरत प्रतिक्षालाय गाठले. फ्रेश होऊन चहाची चुस्की घेतली आणि सात वाजता बाहेर पडलो.
पश्चिम बंगाल मधून सिक्कीमची राजधानी असलेल्या गँगटोक साठी प्रस्थान करणाऱ्या गाडीत बसलो.  इथून पुढचा प्रवास दाट डोंगरघाटातून असल्यामुळे इथून ट्रेनचा प्रवास नसून चाराचाकीने करावा लागणार होता. १० नं राष्ट्रीय महामार्गाची सोबत करून, तिथून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेल्ली गावापाशी असलेली सिक्कीमची बॉर्डर गाठली. तसा दीड तासाचा रस्ता. 

या रस्त्याची खासियत म्हणाल तर उजव्या हातावर खोल दरीत गँगटोक हुन येणारी सिक्कीमची प्रसिद्ध तिस्ता नदी जी त्या डोंगर घाटांच्या दरीतून मनमौजी, मस्तीत वाहताना दिसते.जी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जात पश्चिम बंगाल मधून ब्रह्मपुत्रेला मिळते. जागोजागी मनमोहक दृश्य निर्माण करते.ते दृश्य न्याहाळत प्रवासाची मजा द्विगुणित होते.या नदीच्या पात्रावर रियांग जवळ हॅंड्रो इलेक्टीकॅल प्रोजेक्ट हि कार्यान्वित आहे. सिक्कीमची जीवनदायिनी म्हणूनही तिला संबोधले जाते.

उजव्या हातावर जितकी खोल दरी आहे. तितकिच डाव्या हातावर उंच डोंगररांग अखंडित स्तिथ आहे. उंच उंच वृक्षांनी सजलेले घनदाट जंगल तिचे सौंदर्य आणखीन खुलवते. हि झाली जमेची बाजू पण पावसाळ्यात हे सौंदर्य अधिक खुलत असले तरी, ते सौंदर्य न्याहाळताना पाषाणातील पाषाण हृदयाला कधी पाझर फुटेल आणि पाषाणासकट पुढ्यात येईल याचाही नेम नसतो. मेल्ली पर्यँत जाताना एक दोन ठिकाणी त्याचा प्रत्ययहि आला.

वाट वळणाची, चढ उताराची, उंच झाडांची गर्दी, त्यात पावसाची वर्दी, दरी खोऱ्यातून वाहे, बघा सरितेचे पाणी, निर्मित विद्युत लहरी,जाते गंगेच्या घरी, खाईत जेवढ्या खस्ता, तेवढी हसते तिस्ता, जीवनदायिनी सिक्कीमची, जाते शोधत रस्ता. सौंदर्य तिचे अफाट, डोंगर दाऱ्यांमधी, खुलुन दिसते भलतेच, बघा प्रजन्य वर्षामधी.

मेल्लीला साडे नऊला पोहचून गाडी बदलली. प्रवास होता नदी क्रॉस करून जोरथान्ग कडे. तो हि प्रवास जोरथान्ग कडून येणाऱ्या रंगीत नदीच्या सोबतीने. हि नदी मेल्लीला तिस्ता नदीत समर्पित होते.रंगीत नदी म्हणजेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमची सीमारेषा. नदीच्या पलीकडे सिक्कीम चेकपोस्ट वर सर्वांचे ओळखपत्र पडताळले. पावसाची रिपरिप चालू होती. काही अंतर पार केल्यावरच हा रस्ता नियोजित ठिकाणी पोहचवेल कि नाही या शंकेची पाल मनात चुकचुकली. 

महाकाय पहाडावरून जागोजागी दरडी कोसळलेल्या.  कमी अधिक प्रमाणात कोसळत होत्या. दगडी आणि मातीने रस्त्यात पार चिखल झालेला.जागोजागी रस्त्यावर दरडींचे ढीग होते. त्या गाडीत जीव मुठीत घेऊन बसलो होतो.गाडीचा ड्रायवर मात्र समोर कमी आणि खिडकीतून बाहेर वर डोंगर उतारीवर जास्त लक्ष देऊन होता. अखेर गाडी अश्या टप्प्यावर येऊन उभी राहिली जिथे भर रस्त्यात चिखलाचा जवळ जवळ एक फूट खच पडलेला.

पाषाण उरावर, सौंदर्य राज करतो, हिरवे रान नभात, मेघ खेळवतो, वरून राजा हर्षुन, शिडकाव प्रेमाचा करतो, पाषाणाला भेदून, माणूस वाट करतो, दृष्ट लागते कोणाची, का काळ घात करतो, पाझरत्या हृदयाचा, बांध तुटून पढतो, जीव मुठीत घेऊन, चाकरमानी लढतो, चंद्रावर गेला माणूस, निसर्गापुढे हरतो, पुन्हा उठतो पुन्हा लढतो, पुन्हा पुन्हा तो हरतो.

पावसाची बुंदबंदी चालूच होती. पुढे एक ट्रक पास झाला आणि आमचीही गाडी पुढे सरसावली, वीसएक मीटर चालून गाडी तिथेच रुळली. पूढसा रस्ता बहुतेक तिला नकोसा झाला. पुढे नेण्याच्या प्रयत्नात ती आणखीनच फसली. त्या गाडीच्या रुपाने आमचं आयुष्यच तिथे फसलं होतं. वरून येणारे पाणी कधी आपल्या सोबत दरड घेऊन येईल याचा नेम नाही. मागे जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. मागे गाड्यांची रीघ होती.शेवटचा पर्याय म्हणून त्या चिखलात गाडीला धक्का मारण्यासाठी आम्ही सारेच उतरलो. तरी काही वळेना.अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर गाडी तीस मीटर पुढे सरकून त्यातल्या त्यात कमी चिखल रस्त्यावर गाडी बाहेर निघाली होती.आम्ही पावसाने कमी आणि घामाने अंग जास्त भिजले होते.

तसेच चिखल माखल्या पायाने गाडीत बसलो आणि पुढचा काहीसा त्याच मोलाचा रास्ता कमी करण्याच्या दिशेने गाडी मार्गस्थ झाली. विशेष म्हणजे जागोजागी सिक्कीम शासनाचे jcb होते पण कळलं कि रविवारची सुट्टी मनवण्यात प्रशासन दंग आहे. त्यांना जनहितापेक्षा स्वहित जास्त महत्वाचं वाटत असावं… आणि चाकरमान्यांना नोकरीची चिंता. 

ड्रॉयवरला विचारलं तर म्हणाला हा आयुष्याचा जुगार आम्हाला पावसाळ्यात दिवसातून आठ दहा वेळा खेळवाच लागतो. त्यात आतापर्यंत तरी आम्हीच जिंकत आलोत. पुढे त्या निसर्गाची इच्छा… एव्हाना आम्ही जोरथान्गला पोहचलो आणि सुटकेचा निःश्वास सोडला.

…नितेश पाटील